Strait of Hormuz Update : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला आता महिना पूर्ण होत असताना, जागतिक व्यापाराची मुख्य नस समजल्या जाणाऱ्या 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'वर इराणने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर महिनाभर हा मार्ग पूर्णपणे ठप्प होता. मात्र, आता इराणने 'निवडक नाकेबंदी' जाहीर करत भारतासह आपल्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याचा निर्णय घेतला आहे.
जहाजांची वर्दळ १० टक्क्यांहून कमी
युद्ध सुरू होण्यापूर्वी हॉर्मुझच्या या मार्गावरून दिवसाला सरासरी १०० हून अधिक जहाजे जात होती. मात्र, आता ही संख्या एकेरी अंकावर आली असून, काही दिवसांत केवळ ३ ते ४ जहाजांनाच यातून प्रवेश मिळत आहे. इराणच्या नौसेनेने या मार्गावर कडक पाळत ठेवली असून, विनापरवाना येणाऱ्या जहाजांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
भारतासह 'या' देशांना मिळणार प्रवेश
- इराणने आपल्या मित्र राष्ट्रांची यादी जाहीर केली असून, केवळ या देशांच्या जहाजांनाच हॉर्मुझ पार करण्याची परवानगी दिली आहे.
- मित्र राष्ट्र : भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि थायलंड.
- अटी आणि नियम : या देशांच्या जहाजांना इराणकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल आणि इराणी नौसेनेच्या नियंत्रण कक्षाशी सतत संपर्कात राहावे लागेल.
- प्रचंड टोल : इराण या सुरक्षित कॉरिडॉरमधून जाण्यासाठी प्रति फेरी २ दशलक्ष डॉलर (सुमारे १७ कोटी रुपये) टोल आकारण्याचा विचार करत आहे.
अमेरिका आणि मित्र राष्ट्रांवर 'बॅन'
इराणने अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्या सहयोगी देशांच्या जहाजांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. या देशांच्या जहाजांनी प्रवेश केल्यास त्यांच्यावर थेट हल्ले करण्याची धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिली आहे. यामुळे पाश्चात्य देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे.
भारतासाठी 'लाईफलाईन' का महत्त्वाची?
भारतासाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक आहे कारण, भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के कच्च्या तेलाची आयात याच मार्गावरून करतो. जर इराणने भारतासाठी हा रस्ता उघडला नसता, तर भारतीय जहाजांना आफ्रिकेला वळसा घालून यावे लागले असते, ज्यामुळे पेट्रोल-डीझेलच्या किमती भारतात गगनाला भिडल्या असत्या. इराणी नौसेनेच्या सुरक्षेखाली प्रवास केल्यामुळे भारतीय जहाजांवरील हल्ल्याचा धोका कमी झाला आहे.
